मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली असली तरीही, आजाराचे संकट अद्याप कायम आहे. राज्य सरकार हळूहळू विविध गोष्टी सुरू करत आहेत. मात्र अद्याप सरकारने शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत.
वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली की, दिवाळीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा कधी सुरू करायच्या याबाबत निर्णय घेतला जाईल. सुरुवातीला नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले जातील. त्यानंतर बाकी परिस्थिती पाहता उर्वरित वर्ग टप्प्याटप्याने सुरु केले जाऊ शकतात.
सरसकटपणे शाळा सुरू करून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याशी सरकार खेळणार नाही व त्यांचे आरोग्य धोक्यात घालणार नाही, असेही त्या म्हणाल्या.