अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ नुकताच आता संपणार आहे. महापौर पद रिक्त होत असल्याने पुन्हा एकदा आता पालिकेत राजकीय युद्ध बघायला मिळणार आहे. अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा मोठा दबदबा आहे. आमदार जगताप आणि नगर शहर शिवसेनेमध्ये मोठा राजकीय विरोध आहे. अहमदनगरच्या महापौर पदाची निवडणूक ३० जूननंतर कधीही होऊ शकते. आमदार संग्राम जगताप कोणती राजकीय खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त संख्याबळ असलेल्या शिवसेनेला डच्चू देत अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर पद मिळवले होते. राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी देखील नगर मध्ये मात्र सोयीच्या राजकारणाला मोठा भाव मिळतो. बसपाचे ४ नगरसेवक आहेत. मागच्या महापौर पदाच्या निवडीच्या वेळी सर्वात जास्त भाव बसपा वाल्यानी घेत नगरच्या महापौर पदी बाबासाहेब वाकळे यांना मिळवून देण्यात जायंट किलरची भूमिका बजावली होती आणि यावेळेस देखील त्यांच्याकडे त्याच नजरेने पहिले जात आहे.
शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी महापौर शिवसेना पक्षाचा व्हावा यासाठी थेट मुंबई गाठली आहे. जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर पदाचे उमेदवार यांचे पती संजय शेंडगे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते. मुंबईतून अजूनही शिवसेनेला कोणताही शब्द देण्यात आलेला नाही. काँग्रेस ला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नगरसेवक दीप चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीसाठी मोर्चेबांधणी केलेली आहे. अहमदनगर महापालिका कुणाच्या ताब्यात जाणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.