नंदुरबार : जिल्ह्यातील अधिकधीक नागरिकांची स्वॅब तपासणी करून कोरोना संपर्क साखळी तोडण्याचा प्रयत्न करावा, तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी आजाराची प्राथमिक लक्षणे असतानाच स्वॅब तपासणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब सुरु झाल्यामुळे जास्तीत जास्त स्वॅब तपासणीसाठी फिरत्या पथकांची व्यवस्था करावी. आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरीत उपचार सुरू करण्यात यावे. नागरिकांनीदेखील लक्षणे आढळल्यास वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी.
खाजगी कोविड रुग्णालयात शासकीय दरानेच सेवा दिली जाईल व नियमांचे पालन होईल यांची संबंधितांनी दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालय वाढीव दराने बिल देत असल्याच्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना बाधित व्यक्तिंची संख्या सातत्याने वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यामातून सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे. विशेषत: ग्रामीण भागात नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर केला पाहिजे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, घराबाहेर पडल्यावर शारिरीक अंतर राखावे व हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनेटायझर लावावे. अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन यावेळी के सी पाडवी यांच्या वतीने करण्यात आले.