सोलापूर : महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं आहे, या नुकसानभरपाई आणि अशा संकटाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी पाहणी केली आहे. मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागात जाणे म्हणजे एक प्रकारचा दिलासा असतो. मुख्यमंत्र्यांनी एकाच जिल्ह्यात जाऊ नये, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनाही आंबेडकरांनी खडे बोल सुनावले. देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात अजून आपण मुख्यमंत्री असल्याची हवा आहे, असाच कारभार सुरू असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.
विशेष म्हणजे पंतप्रधानांवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली. प्रकाश आंबेडकरांनी देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींची तुलना एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीशी केली आहे. मोदी देश विकायला निघाले आहेत. व्यसनाधीन व्यक्ती जसा शेवटी घर विकायला काढतो, त्याचप्रमाणे मोदींनी देश विकायला काढला आहे, असं टीकास्त्र प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर सोडलं आहे.
तीन पायांच्या या सरकारमधील एक पाय मदत जाहीर करू नये म्हणून दुसऱ्यावर दबाव टाकत असल्याचा मला वास येत असल्याचीही टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. पुढच्या महिन्यात साखर कारखान्याला मदत करायची आहे म्हणून हात आखडला गेला असल्याचा आमचा आरोप असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्र राज्यातील आणि इतर राज्यातील धरणे जी एकमेकांवर अलंबवून आहेत, त्यांच्यात एक समन्वय समिती आहे. मात्र ती व्यवस्थित कार्यरत नाही, असं दिसतंय. मागच्या वर्षी देखील पाऊस चांगला झाला, त्यामुळे महाराष्ट्रातील धरणे पूर्ण भरली होती. जून महिन्यात 40% धरणात पाणी होतं, याही वर्षी पाऊस चांगला झाला आणि सप्टेंबरअखेर सगळी धरणे तुडुंब भरून गेली.
राज्याची धरणे जशी भरली तशीच कर्नाटक, आंध्र यांची देखील भरली, वरची धरणं भरली की दरवाजे खुले करतात आणि खालची धरणे भरतात. मागच्या दौऱ्यात मी कोव्हिडसाठी आलो होतो, त्यावेळी मी पालकमंत्री भरणे यांना काळजी घेण्यास सांगितल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
25 ऑक्टोबरला बीड भगवानगड पायथ्याशी ऊसतोड कामगारांची परिषद आम्ही बोलावली आहे. महागाई वाढलेली आहे, कोरोनाची परिस्थिती आहे, ऊसतोड कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. मागचे सगळे करारनामे झाले ते संपत आहेत. मुख्यमंत्री यांना विनंती केंद्राकडून पैसे येईल तेव्हा येईल, राज्याच्या तिजोरीतून आता मदत करावी, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
Read Also :
“स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेते राजु शेट्टी यांच्या मधील शेतकरी मेला आहे” https://t.co/uWfzEvSRDs @rajushetti @mipravindarekar @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020