मुंबई : राज्यात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असं वातावरण सध्या आहे. सरकारच्या विरोधात कोणी बोललं की तुरुंगात टाकलं जातंय, असा घणाघाती आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेले निकाल ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. गोस्वामी आणि कंगनाच्या विचारांशी आम्ही सहमत नाहीत. मात्र, ज्या प्रकारे कारवाई झाली आणि जे कोर्टानं म्हणणे मांडले त्यानंतर या सरकारला चपराक बसली आहे. यातून सुधारण्याऐवजी सत्तेचा अहंकार हे सरकार दाखवत आहे. सत्तेच्या अहंकारातून सरकार कश्याप्रमाणे वागते ते आत्ताचं सरकार तेच दाखवून देतं आहे. असं अहंकारी सरकार जगाच्या पाठीवर कुठेच चालत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
या अहंकारी सरकारला आम्ही योग्य ते उत्तर देऊ. सरकारविरुद्ध संघर्ष करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. जनतेसाठी आम्ही सरकारला उत्तर देऊ. हे सरकार अहंकारी आहे या सरकारचे निर्णय हे तुघलकी आहे. अधिवेशनात जो काही वेळ आम्हाला मिळेल त्यात आम्ही सरकारला जाब विचारणारच, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
अधिवेशन सात तासांचं घेतलं जातं आहे. त्याला काहीच अर्थ नाही. आम्ही जनतेचे प्रश्न कसे मांडायचे? वाढीव वीज बिलांबाबत आणि सरकारच्या या धोरणाबाबत आम्ही ज्यांना जाब विचारणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.