मध्य रेल्वेमार्ग शेतकऱ्यांमार्फत ग्राहकांना फळ, भाजीपाला इत्यादी पुरवण्यासाठी ‘शेतकरी पार्सल रेल्वे’ उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. पहिली ‘शेतकरी रेल्वे’ उद्या सकाळी 11 वाजेपासून धावेल. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या ट्रेनचा शुभारंभ करणार आहेत .
ही विशेष शेतकरी गाडी नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि बक्सर स्थानकांवर थांबेल. या दृष्टीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकऱ्यांना थेट पहिल्या रेल्वेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. शेतकर्यांची मागणी लक्षात घेता, रेल्वेचे स्टॉप सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.
शेतकरी रेल्वे नाशिक ते देवळाली, बिहार, दानापूर पर्यंत धावणार आहे . या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन रेल्वेमार्गाने नेले जाईल. ही गाडी वेगवेगळ्या स्थानकांवर माल उचलण्यासाठी आणि उतरवण्यासाठी थांबेल. 7 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक शुक्रवारी देवळाली ते दानापूर आणि रविवारी दानापूर ते देवळाली या विशेष गाड्या धावतील. या ट्रेनमध्ये 10 पार्सल व्हॅन असणार असल्याची माहिती समोर आली आहे.