अमरावती : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर दौऱ्यावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. 11 नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आले. यानंतर त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला होता.
राज्यभरात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल व त्रस्त झाला आहे, तर शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सोयाबीन व कपाशीच्या शेतात जाऊन पाहणी केली,
त्यावेळी सरसकट सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणांनी केली आहे. त्यांनी दर्यापूर भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली.
मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, कुठल्याच परिस्थितीमध्ये शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ओल्या दुष्काळाने प्रभावित झालेल्या भागात भेट दिली. देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून एका गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क झालेला नाही. आठ दिवसांपासून वीजही आलेली नाही. संकट अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा ऊस, सोयाबीन, कांदा सर्व काही नेस्तानाबूत झालं आहे. अधिकारी अजूनही आलेले नाहीत.
पंचनामे झाले नाहीत. मुळात पंचनाम्याची गरजच नाही. शेतीचं शंभर टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी म्हणून आम्ही सरकारवर दबाव आणू, असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच केंद्र सरकारकडे मदत मागितल्यास बिघडतं कुठे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यात विचारल्यानंतर फडणवीसांचा संताप पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट लडाखला जातात, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये, असंही फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं.
“नुकसानग्रस्तांना काय मदत करणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगणं अपेक्षित आहे. परंतु अशा प्रकारची थिल्लरबाजी, थिल्लरबाजीशिवाय मी दुसरं काही म्हणणार नाही. अशा प्रकारची थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. मुख्यमंत्र्यांना माहित नसेल, मोदीजी तर थेट लडाखला जातात, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये. आज ते थोडक्याकरता बाहेर पडलेत, दोन तीन तासांचा प्रवास केलाय, मोठी गोष्ट आहे. गावकऱ्यांनी काय रिस्पॉन्स दिला त्यांनी पाहिलेलं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Read Also :
बबनराव पाचपुते धोका देतील असं स्वप्नात वाटलं नव्हतं… https://t.co/aBxfsiGWPd @Babanrao5pute @RVikhePatil @drsujayvikhe
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020