बीड : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दोनच दिवसात फडणवीस जळगावात एकनाथ खडसेंच्या घरी चहापानासाठी गेले. फडणवीसांच्या या दोन भेटीवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीगाठींवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला बीड दौऱ्यावर असलेले भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक उत्तर दिलं आहे.
फडणवीस आधी ‘सिल्वर ओक’वर गेले, त्यानंतर ते खडसेंच्या घरी गेले. आता ते मातोश्रीवरही येतील असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शेलार यांनी खोचक उत्तर दिलं. ‘मी सुद्धा संजय राऊतांचं ते वाक्य ऐकलं आहे, आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं वाक्य म्हणजे आमंत्रणाचा एक प्रकार आहे. ते आमंत्रण आम्ही स्वीकारलं’, असं आशिष शेलार म्हणाले. शेलार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत समाजाची भावना तीव्र आहे. महाविकास आघाडीने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा एकप्रकारे कोल्ड ब्लडेड मर्डर केल्याची घणाघाती टीकाही शेलार यांनी केली आहे. आज गळे काढणारे त्यावेळी आरक्षण नाकारत होते. आता भाजपला शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाकाने कांदे सोलू नका. आम्हाला संपूर्ण आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षण लढ्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा शेलार यांनी यावेळी केली.
तसेच मराठा समाजाची टिंगल टवाळी करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. मराठा समाजाला 3 हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ५ जून रोजी बीडमध्ये विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चा होत आहे. या मोर्चाला भाजपचा पाठिंबा आहे, असंही शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.