मध्य प्रदेश – मध्य प्रदेशात सरकार गमावल्यावर आणि पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठं विधान केलंय. छिंदवाडा येथील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना कमलनाथ यांनी राजकारणाला ‘रामराम’ करण्याचे संकेत दिले आहेत.
“मला आता आरामाची गरज आहे. मी आतापर्यंत खूप प्रगती केलीय”, असं कमलनाथ म्हणाले. काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्याविरोधात वारंवार आवाज उठवला जात असताना त्यांनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कमलनाथ केवळ राजकीय पद सोडण्याच्या नव्हे, तर राजकारणातूनच सन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कमलनाथ सध्या त्याच्या मुलासह छिंदवाडाच्या दौऱ्यावर आहेत. छिंदवाडा कमलनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो.
कमलनाथ हे मध्य प्रदेश विधानसभेत विरोधीपक्ष नेत्यासह काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष देखील आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर काँग्रेसमध्येच कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. चुकीचे तिकीट वाटप, कमकुवत उमेदवार आणि चुकीची रणनिती आखल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले.