लातूर: महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून कमी काळ सत्ता गाजविलेले सुधाकरराव नाईक हे एक बाणेदार आणि पाणीदार नेते होऊन गेले होते. महाराष्ट्र राज्याच्या भल्यासाठी जे करायचे ते मनापासून आणि धडाडीने करायचे असा जणू त्यांचा बाणाच होता. त्यांनी त्यांच्या करारी स्वभावाने राजकारणातील गुंडा गर्दीला त्यांच्या करारी स्वभावाने छेद दिला होता. मुख्यमंत्री म्हणून प्रशासनात त्यांनी मोठा दरारा त्या काळात निर्माण केला होता. यवतमाळ जिल्हातील पुसद तालुक्यातील गहुलीच्या मातीतून सुधाकरराव हे आलेले होते.
सुधाकरराव यांचे वडील लोकनेते बाळासाहेब नाईक तर त्यांचे काका वसंतराव नाईक हे होते. या जेष्ठांच्या तालमीत वाढलेले सुधाकरराव हे राजकारणातील अत्यंत वेगळे रसायन ठरले. गहुली गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल या संपूर्ण प्रवासात आपला करारी स्वभाव आणि बाणेदारपणा त्यांनी जोपासला होता. कला, संस्कृती, साहित्याचे रसिक असलेल्या सुधाकरराव यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील टिकवून ठेवली होती.
राजकारण व प्रशासनावर आपली ठाम मुद्रा उमटवलेले माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी राज्यात जलक्रांतीची बिजे रोवली. त्यांचे कार्य आणि त्यांची राजकीय वाटचाल थक्क करणारी आहे. स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन !#जलसंधारण_दिन pic.twitter.com/1UqceRWiaF
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) May 10, 2021
काका वसंतराव नाईक यांच्या पावलावर पाउल ठेवत सुधाकररावांनी ‘जलक्रांती’ चा ध्यास घेतला होता. राज्याच्या शेतीचा प्रश्न बागायती नसून कोरडवाहूचा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील जलसंधारणाकडे विशेष लक्ष दिले. जलसंधारण खात्याची निर्मिती करणारे ते महाराष्ट्रातील पहिले नेते होते. त्यांची जलसंधारणाची विचारधारा आणि धारणा ही अतिशयक पक्की होती. मुख्यमंत्री पद गेल्यानंतरही त्यांनी पाणी प्रश्नी विशेष काम केले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जलसंधारण परिषदेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते.