मुंबई: माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर ईडीने काल (दि.२५) शुक्रवारी छापा टाकण्यात आला होता. सकाळी ८ वाजताच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांच्या दोन गाड्या देशमुख यांच्या बंगल्यावर दाखल झाल्या. ७ ते ८ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. इडीने केलेल्या या छाप्यानंतर आता अनिल देशमुख यांना अकरा वाजता आपल्या कार्यलयात हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे.
परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद
अनिल देशमुख म्हणाले, माझ्यावर जे खोटे आरोप केले होते आणि ते सुद्धा परमबीर सिंग यांना पदावरुन हटवण्यात आल्यावर केले होते. पपरमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि त्यांची भूमिका संशयास्पद होती त्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्यात आलं. पदावरुन हटवल्यावर त्यांनी आरोप केले. त्यांना आरोप करायचे होते तर आयुक्तपदावर असताना आरोप करायला हवे होते. वाझे, काझींसह पाचही अधिकारी हे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. या प्रकरणी सीबीआय, करत आहे आणि चौकशीत सत्य समोर येईन.
ईडीने बार मालकांचा नोंदवला जबाब; चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील १० ते १२ बार मालकांचे जबाब नोंदवले आहेत. या बार मालकांनी आपण हप्ता दिल्याची कबुली ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. १० ते १२ मालकांनी मिळून काही महिने चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. या जबाबानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आज दिवसभर विविध ठिकाणी कारवाई सुरू असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, बार मालकांनी दिलेल्या या जबाबात अनिल देशमुख यांचे नाव घेतले की नाही, तसेच त्यांचा या प्रकरणात संबंध आहे की नाहीये हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. मात्र, परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर ईडीच्या पथकाकडून जी कारवाई सुरू आहे त्यावरुन अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे.