जळगाव: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, राज्य सरकारच्या कामावर भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे अनेक लोकांना यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. लोकांना त्यांच्या कोणत्याचं समस्येवर उत्तर मिळत नसल्याने त्यांच्यासमोर मरणाशिवाय पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. लोकांच्या या समस्या राज्य सरकार सोडू शकत नसल्याने सरकारने हात वर केल्याचा आणि सरकार अपयशी ठरल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
कोरोनाच्या या कठिण काळात जनतेने आता जावे तरी कोणाकडे, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाचा प्रसार सर्वत्र वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची चाचणी केली गेली पाहिजे, ती केली जात नसल्याने कोरोनाचा प्रसार अधिक वाढत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना कोरोना चाचणी सक्तीची केली पाहिजे असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोनाची लस मिळत नसल्याने राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. पण आधी राज्य सरकारने बाधित झालेल्या रुग्णांच्या बाबत उचारासाठी काय उपाय योजना केल्या, त्याबाबत सांगावं, आणि मग केंद्राकडे बोट दाखवलं पाहिजे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेले आरोप पाहता देशमुख यांनी चौकशीला समोर जायला हवे, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. विविध ठिकाणाहून पैसे गोळा करण्याचे आरोप पाहता पोलिसांच्या मध्यामतून हा मोठ्या खंडणीचा प्रकार आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप हे अधिकाऱ्यांनी केले आहेत, त्यामुळे विरोधकांकडे बोट दाखवणे योग्य नसल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीला समोरं जावं. चौकशीअंती खरं – खोटं समोर येईल. त्यात काही तथ्य नसेल तर प्रश्नच राहणार नाही, असंही महाजन म्हणाले.