भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नदी काठावरील गावात पाणी शिरल्याने येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 4200 कुटुंबातील 18 हजार लोकांना तात्पुरत्या शिबीरात हलविण्यात आले आहे. या शिबीराला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी भेट दिली. तसेच भंडारा शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी सुद्धा केली.
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री @vishwajeetkadam यांच्यासह पूरपरिस्थिती ची पाहनी केली, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.
पूरग्रस्तांसाठी उत्तम जेवन, स्वास्थ्य, राहण्याची सोय करा..आणि संबंधित गावातील तलाठी,ग्रामसेवक यांनी सहकार्य करावी..व उपाययोजना करावी pic.twitter.com/MOqy32aSu5— Nana Patole (@NANA_PATOLE) September 1, 2020
पूरग्रस्तांसाठी उत्तम जेवन, स्वास्थ्य, राहण्याची सोय करा आणि संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक यांनी सहकार्य करावी व उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना नाना पटोले व विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला दिल्या.
भंडारा शहर 5, भंडारा ग्रामीण 23, पवनी 22, तुमसर 5, मोहाडी 6 व लाखांदूर 2 असे तात्पुरते शिबीर उभारण्यात आले आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 163 सदस्य विविध भागात 30 बोटीच्या साहाय्याने पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोहचवित आहेत.