सांगली: राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. दिवसेंदिवस कर्मचारी संपावर जात आहे आणि संप चिघळत आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सुख देखील पगार न मिळाल्यामुळे हिरावले गेले आहे. सरकारी पक्षाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. यावरून आता विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने देखील आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनात सहभाग घेतला होता. भाजप नेते आणि विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना शाप देत ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला सुखानं जगू देणार नाही असे देखील म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पडळकर म्हणाले काल परत एका बीडमधील एसटी कामगार बांधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला पण, डॅाक्टरांमुळे त्यांचा प्राण वाचला. मात्र परिस्थिती नाजूक आहे. आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण हे प्रस्थापितांचं हे नालायक सरकार झोपेचं सोंग घेत आहे आणि कोर्टाची दिशाभूल करतं आहे.
जर या महाभकास आघाडीने वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती तर ३१ जणांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेची होणारी गैरसोय टळली असती. त्यामुळे जराही नैतिकता शिल्लक असेल तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून परिवहनमंत्री अनिल परब राजीनामा देणार का? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता निर्णायक वळणावर पोहचला आहे. या संपावर तोडगा म्हणून आज दूपारी ३ वाजेपर्यंत अध्यादेश काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यात त्रिसदस्यीय समिती स्थापन करुन या समितीपुढे कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आणि मागण्या आहेत त्या मांडाव्यात आणि त्यावर १२ आठवड्यांच्या आत तोडगा काढावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.