मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये मागील काही दिवसांमध्ये जुंपली आहे. राज्यात यामुळे राजकारण चांगलेच तापले असून, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वादात उडी घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केली होती. यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी कंगना राणावत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपाल कोश्यारी यावादाबाबत केंद्र सरकारकडे अहवाल देण्याची शक्यता आहे. दरम्यान कंगना राणावत वादामध्ये आपली काही भूमिका नसल्याचे भाजपाने म्हटले होते. मात्र आता या प्रकरणावरून राज्यपालांनी केंद्राकडे अहवाल पाठवण्याची तयारी केल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद चिघळणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत कंगनासोबतच शिवसेना आणि भाजपामध्येही सामना रंगण्याची शक्यता आहे.