जळगाव : पंतप्रधान मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपर्यंत अनेक मंत्र्यांनी तुफान प्रचार केल्यानंतर देखील भाजपला पश्चिम बंगालमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने 200 पेक्षा अधिक जागा मिळवत सत्ता कायम ठेवली आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याने संपूर्ण देशाचे लक्ष याकडे होते. महाराष्ट्रातील नेत्यांकडे या निकालावर भाष्य केले जात असून, भाजपकडे बंगालमध्ये रस्त्यावर उतरून काम करणारे कोणी नसल्याने त्यांचा पराभव झाला असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, जपकडे बंगालचे नेतृत्त्व करणारा स्थानिक चेहरा नव्हता. त्यामुळेच राज्यातील जनतेने भाजपला नाकारले. जनतेने राज्यात कोण नेतृत्त्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जींना पुन्हा संधी दिली आहे.
कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो. राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्त्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हे सिद्ध झाले आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून मोदींचा करिष्मा ओसरला का? यापेक्षा राज्याचा विकास कोण करू शकतो, मातीशी कोण जुळला आहे, याचा विचार मतदारांनी केला. मोदींकडे जे लोक गेले होते, ते ममता दीदींचेच अपत्य होते. ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’, हे जनतेने चांगले ओळखून घेतल्याने भाजपच्या गद्दारीला धडा शिकविल्याचेही ते म्हणाले.