“ज्यांनी 5 वर्षे राज्याचं गृहखातं सांभाळलं त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही. हे दुर्दैवी आहे”, अशा शब्दात राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला.
हसन मुश्रीफ म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येत आहे. हे राजकारण आहे. 5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत हे दुर्दैव आहे.”
हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगरला झेंडा वंदन पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे हे आव्हान असल्याचं नमूद केलं. तसेच प्रशासनाला रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.