मुंबई : राज्यात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीच्या पुरवठ्यावरून सातत्याने केंद्र व राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता पुन्हा एकदा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज आहे, पण फक्त 25 हजार लसी मिळत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
राजेश टोपेंनी सांगितले की, राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 27 वरून 22 टक्क्यांवर आला आहे. ऑक्सिजन महत्त्वाचा विषय आहे. राज्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन नर्स नेमण्याचे आपण ठरवलं आहे. तसेच ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजनचे लीकेज थांबवणे, प्लांटची तपासणी करण्याचं ठरवलं आहे.
45 वर्षे तसेच पुढील वय असलेल्या नागरिकांसाठी फक्त 30 हजार व्हॅक्सिन उपलब्ध होत्या. सध्या राज्यात 9 लाख डोस आले आहेत. त्यामुळे 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ते द्यायचे आहेत. राज्यात सर्व ठिकाणी ते वितरीत केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.