अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वक्तव्यांमुळे विशेष चर्चेत आहे. यातच मुंबई पोलिसांकडून सुरक्षा नको आणि मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटत असल्याचे वक्तव्य केल्याने कंगनावर टीकेची झोड उठत आहे. कंगनाच्या या विधानमुळे अनेक नेत्यांनी महाराष्ट्र परतू नको, असा सज्जड दम देखील भरला. यानंतर कंगनाने केंद्र आणि हिमाचल प्रदेश सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती.
कंगनाच्या वडिलांनी मागणी केल्यानंतर आता हिमाचल प्रदेश सरकार कंगनाला सुरक्षा देणार आहे. याबाबतची माहिती स्वत: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली.
जयराम ठाकूर म्हणाले की, कंगनाच्या वडिलांसोबत त्यांनी फोनवरुन संवाद साधला होता. हिमाचल सरकार कंगनाला पूर्ण सुरक्षा देईल, त्यासाठी प्रदेशच्या पोलिस महासंचालक तसे आदेश देण्यात आले आहेत. 9 सप्टेंबरला कंगना मुंबईला येणार आहे आणि हिमाचलच्या मुलीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.