मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर, तसेच कार्यालये मिळून १० ठिकाणी सीबीआयने आज सकाळी धाडी टाकून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी, सीबीआयने अचानक केलेल्या या संपूर्ण कारवाईवर टीका करताना, एक ट्विट केले आहे. तसेच या छापेमारीवर सवाल देखील उठवले आहेत.
‘’कुछ तो गडबड है. मा. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर धाडी, एफआयआर वगैरे हा अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय आणि तर्कसंगत दिसत नाही. कुछ तो गडबड जरुर है, असे ट्विटमध्ये लिहून संजय राऊत यांनी या संपूर्ण कारवाईवरच शंका घेतली आहे.
यावरून भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली असून, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत, बरोबर आहे, काहीतरी नाही, इथे तर सगळीच गडबड आहे, असं म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाईचा दाखला देत त्यांनी, तपासात काही ‘गडबड’ आहे असे वाटल्यास कारवाई करण्याचे आदेश म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत, आता काय त्यांच्यावरही विश्वास नाही का, जर काही केलंच नाहीये तर भिती कशाची, असा सवाल करत हल्लाबोल केला आहे.
सही पकडे है….
कुछ तो नही……यहाँ तो बहुत कुछ गडबड हैम्हणूनच माननीय हायकोर्टानं तपासात काही 'गडबड' वाटल्यास कारवाई करण्याचे आदेश #CBI ला दिले आहेत
आणि आता दया चा न्यायव्यवस्थेवरही विश्वास नाही असं म्हणायचयं का ??
जर कुणी काही केलचं नसेल तर नेमकी एव्हढी भिती आहे तरी कशाची pic.twitter.com/K0DgOsUQoV
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 24, 2021
तसेच त्यांनी, गडबड केली म्हणूनच सीबीआय आली आणि आता बडबड न करता न्यायालयाचा आदेश व्यवस्थित वाचावा, जेणेकरून न्यायव्यवस्थेची तर्कसंगतेचा आपणास बोध होईल, असा खोचक टोला अजून एक ट्विट करत ही कारवाई गैर आहे, असं म्हणणाऱ्या नेत्यांना लगावला आहे.
“गडबड” केली म्हणूनच #CBI आली
आणि
आता “बडबड” न करता न्यायालयाचा आदेश व्यवस्थित वाचावा जेणेकरून न्यायव्यवस्थेची तर्कसंगतेचा आपणास बोध होईल pic.twitter.com/ttq5zYQpYq— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 24, 2021