लोणावळा: काँग्रेसने निवडणूक स्वबळावर लढाव्यात असे मी म्हणालो होतो व त्यावर आजही ठाम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना ‘कामाला लागा’ सांगतात ते ठीक आहे! अजित पवार काँग्रेसच्या नेत्यांची काम करत नाहीत, ते चालते! अशी टीका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत – त्यांना समझोताच करायचा नसेल आणि सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा असेल तर काहीच बोलायचे नाही. ते लोणावळा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
नाना पटोले यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर मविआमधील त्यांचे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या राजकीय ताकतीवरून काँग्रेसची चेष्टा केली. मात्र, त्याच वेळी ते दोघेही आमची स्वबळाची तयारी आहे, असे सांगत होते. शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर नुकतेच शिवसैनिकांना आवाहन केले – आघाडीची काळजी करू नका, स्वबळावर निवडणूक लढायची तयारी करा.
नाना पटोले म्हणाले, स्वबळाबाबत मी जे बोललो त्यावरून माघार घेणार नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पुण्याचे पालकमंत्री बारामतीचे आहेत. ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काम करत नाहीत. आपण म्हणतो काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावे, पण आपल्या संपर्कमंत्र्यांचे ऐकायचे की नाही ते तेच ठरवतात. कारण त्यासाठी त्यांचीच सही लागते. कुठल्याही समित्यांवर नाव पाठवायची असतील तर त्याला संपर्कमंत्र्यांची सही चालत नाही. त्यासाठी पालकमंत्र्यांचीच सही लागते. या त्रासालाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद बनवावी.
कर्तृत्वाने पालकमंत्री बनेन
हक्काचे दिले जात नसेल, तर कर्तृत्वाने मी इथला पालकमंत्री बनेन, अशी शपथ घ्या. आपल्या पक्षाचा माणूस या पालकमंत्र्याच्या खुर्चीवर बसेल अशी ताकत निर्माण करा, असे आवाहन पटोले यांनी केले.