मुंबई – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला असून, राज्य सरकारने दिलेलं मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. त्यामुळे हा राज्य सरकारसाठी खूप मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं सांगत, मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय दिला. तसेच सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणं शक्य नसल्याचं, सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत प्रतिक्रया दिली आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्यावर कोणीही राजकारण करू नये मराठा समाजातील युवावर्गाला काय मदत करता येईल याबाबत सत्ताधारी व विरोधकांना एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत दिली आहे.
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला याचं वाईट वाटतं. आरक्षण मिळाले असते तर त्याचा फायदा झाला असता. मात्र, आता सत्तेत असणाऱ्या आणि विरोधी पक्षात असणाऱ्यांनी एकत्र येऊन समाजातील युवा वर्गाचा हिताचा विचार करावा. आता यांच्यात कोणीही राजकारण करू नये. शेवटी कोर्टाचा निकाल हा कोर्टाचा निकाल असतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
मराठा समाजातील तरुण पिढीला शैक्षणिक उद्योग यासह विविध क्षेत्रामध्ये काय मदत करता येईल ,याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी बसून निर्णय घ्यावा कारण मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा या समाजाने उभा केलेला एक मोठा लढा आहे. त्यामागे कुठल्याही प्रकारची राजकीय शक्ती नाही. तो एक समाजाचा प्रश्न आहे त्यामुळे या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करण्याची आवश्यकता आहे; असेही रोहित पवार म्हणाले.