जळगांव : देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यानंतर एकनाथ खडसेंच्या घरी पाहुणचार घेऊन गेले. त्यावेळी एकनाथ खडसे नव्हते. त्यात खडसेंनी शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळं अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र मुक्ताईनगरमध्ये परतल्यानंतर लगेचच खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही चर्चांना अर्थ नाही. मी आता कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोडणार नाही, त्याचवेळी काही लोकांनी भाजपमध्ये असताना मला खूप छळलं, अशी स्पष्ट भूमिका खडसेंनी मांडली. ते मुक्ताईनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, आता कोणत्याही स्थितीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करणार नाही, असं सांगतानाच त्यांनी जुन्या जखमा अद्याप भरल्या नसल्याचे संकेत दिले. मी भारतीय जनता पार्टीमध्ये काही विशिष्ट लोकांनी माझा भरपूर छळ केला. माझ्यावरती केसेस केल्या, दाऊदच्या बायकोशी संबंध असल्याचं सांगत चौकशा करण्यात आल्या, अँटी करप्शनच्या चौकशा केल्या, अनेक खोटेनाटे खटले रचण्यात आले. एवढंच नाही तर सत्तेच्या लालसेपोटी एकनाथ खडसे आडवा येऊ शकतो म्हणून माझा छळ केला, असे आरोप खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं आहे. घटनेमध्ये ओबीसींना ५० टक्के आरक्षण मिळावी अशी तरतूद केलेली आहे. पण आरक्षण रद्द झालं हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. त्यामुळं राज्य सरकारनं ओबीसींनी न्याय देण्यासाठी समिती गठीत केली आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. फडणवीस यांनी नुकत्यात केलेल्या दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. रत्नागिरी सारखी, सिंधुदुर्ग सारखी मराठवाड्या सारखी मदत मिळवून देण्याचं आश्वान शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे. पण देवेंद्रजींनी याठिकाणी आम्ही मदत मिळवून देऊ असं सांगितलं आहे. आता ते राज्य सरकारकडे मदत मागणार आहेत. पण केंद्रानंही मदत केली पाहिजे. हा वादळाचा भाग आहे. तौक्तेसाठी पंतप्रधानांनी गुजरातला मदत केली. पण अद्याप महाराष्ट्राचा दौरा केला नाही. वादळाने रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं केंद्रानं ताबडतोब मदत करण्याची मागणी खडसेंनी केली.