रत्नागिरी: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी यांनी चांगलेच भडकले. आमच्या हाती सूत्र द्या, चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
गेले दोन वर्षे राज्यसरकार कोरोना महामारीचा सामना करत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस फक्त त्रास देण्याचं काम करत आहेत. राजकारणात आतापर्यंत पाहिलं आहे की राज्यावर कोणतंही संकट आलं तर सर्वजण पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येतात आणि संकटांचा सामना करतात. मात्र, दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी फक्त त्रास देण्याचा काम केलं आहे. त्यामुळे माझ्या मते त्यानी राजकारणातुन संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपले. त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
फडणवीस काय म्हणाले होते?
पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीसांना जनताच आता संन्यास देईल – नाना पटोले
“ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. आता मात्र भाजप नेते ओबीसींचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत. सत्ता दिल्यास महिन्यात आरक्षण आणतो, अन्यथा राजकीय संन्यास घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. परंतु त्यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली असून जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.