जळगाव – एकनाथ खडसे यांनी मंगळवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विधानपरिषदेतील आमदारकीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावेळी खडसे यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
पवार साहेबांनी या नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर मला इतरांच्या मतांची गरज पडणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले. त्यामुळे आता विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.
कालपर्यंत अनेक लोक एकनाथ खडसे संपले असे म्हणत होते. मात्र, आता नाथाभाऊंनी एकच प्रकरण बाहेर काढले तर महाराष्ट्र हादरला. हे तर पहिलेच प्रकरण आहे, अजून कितीतरी प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात मोठी राजकीय गँग अडकली आहे. मात्र, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही जण नाही. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.