अमरावती – काही दिवसांपूर्वी राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अमरावती जिल्ह्यालाही बसला होता. यात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
निदर्शकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळी लागलेले कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध केला. राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असेल तर ‘मातोश्री’वरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला.
नवनीत राणा म्हणाल्या,”अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक – सोयाबीनचे पूर्ण हातातून गेले. यानंतर कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी व लाल्या आला आहे. कपाशीचे पीकसुद्धा वाया गेले आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी ५० हजार रुपये जमा करावी. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही.”
दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमवीर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या प्रमुख नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे केले होते. यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आली आहे.