मुंबई : भारतात कलम 370 आणि प्रलंबित राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित करत दिल्लीतील मोदी सरकारला साद घातली आहे.
मंत्री अशोक चव्हाण हे परभणी येथील एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करताना त्यांनी हा सवाल केला. या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही? मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे, अशी आशा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. मुळात हा आरोप राजकीय आहे. भाजपवाले यात विषयात घुसले असून त्यांनीच मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याची बोंब उठवली आहे. खरे तर सरकार मराठा आरक्षणावर गंभीर असून कामही करत आहे. हा प्रश्न खंडपीठाकडे ठेवून चालणार नाही. तो घटनापीठाकडे असावा, असं आमचं म्हणणं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली, असा गौप्यस्फोटही चव्हाण यांनी केला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला, असेही त्यांनी सांगितलं.
Read Also :
पुलवामा हल्ल्यावर संशय घेणाऱ्या काँग्रेसने आता जाहीर माफी मागायला हवी, प्रकाश जावडेकरांचा घणाघात https://t.co/qlDyRIl8pS@BJP4Maharashtra @PrakashJavdekar @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020