मुंबई : राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय केले जात आहेत. मात्र तरी देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील करोना बाधितांची संख्या ६० हजारांवर गेली असून, त्यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे.
परिणामी इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. अशा हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.
दरम्यान, राज्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या २४ तासांत तीन वेळा फोन केला होता, मात्र पंतप्रधान कार्यालयकडून मुख्यमंत्र्यांना, मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचाराला व्यस्त आहेत असे उत्तर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मात्र ठाकरे आणि मोदी यांच्यात चर्चा झाली असून, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठीने प्रसारित केले आहे.
तसेच चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यानी, राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, त्यामुळे महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्रामध्ये काल एका दिवसात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून, महाराष्ट्रात काल दिवसभरात ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ३९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ४५ हजार ३३५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात देखील गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३० हजारांच्यावर नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ कोटी ४५ लाखांवर पोहोचली असून, करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७५ हजार ६४९ वर पोहोचला आहे. देशातील करोनाग्रस्तांपैकी १६ लाख ७९ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.