मुंबई : राज्यातील वाढत्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले असून, मुख्यमंत्र्यांनी ५ एप्रिल पासून राज्यात नवीन करोना प्रतिबंधक नियमावली लागू केली आहे. या नियमावलीमुळे सामान्य जनतेचे जीवनचक्र पुन्हा मंदावले असून, लॉकडाऊनला घेऊन नागरिकांमधून संमिश्र भावना उमटत आहेत. तसेच, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील या आता या नियमावलीला विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, करोना साथीच्या लसीकरणा संदर्भात आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी करोनाच्या लसीकरणाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र अव्वल असला, तरी हवा तसा पुरवठा केंद्राकडून केला जात नसल्याचं सांगत, लसींच्या पुरवठ्या संदर्भात केंद्रावर संताप व्यक्त केला.
टोपेंच्या या विधानावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला टोला लगावला आहे. “राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा. देशात सर्वाधिक लसींचा पुरवठा महाराष्ट्रालाच केला जात आहे”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच, “राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते करोना लसीकरणासंदर्भात करत असलेले आरोप संपूर्णपणे चुकीचे आहेत. राज्याच्या लसीकरण क्षमतेनुसारच टार्गेट ग्रूपला आवश्यक इतक्या लशींचा पुरवठा केंद्राकडून केला जात आहे. केंद्र सरकारकडून सर्वाधिक लसी महाराष्ट्रालाच दिल्या जात आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या गोष्टी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी चर्चा करावी. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे आधी बंद झालं पाहिजे”, असा हल्लबोल फडणवीसांनीं ठाकरे सरकारवर केला आहे.