पुणे : राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्यावरुन झालेला विवाद या आधीदेखील झाला आहे. पण ही काय वादाची वेळ आहे का? आधी सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्याव, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. फडणवीस आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील उंडवडी गावाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
‘राज्य सरकारला डिफेन्ड करणं एवढंच पवारांना काम’
शरद पवार यांना राज्य सरकारला डिफेन्ड करावं लागत आहे. या सरकारचा इतका नाकर्तेपणा बाहेर येतोय की प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या सरकारला डिफेन्ड करणं एवढंच काम शरद पवार यांच्याकडे आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. आमचा दौरा घोषित झाल्यानंतर या सरकारमधील अनेक पालकमंत्री आपल्या मतदारसंघात गेले. तोपर्यंत ते गेले नव्हते. आमचा दौरा घोषित झाल्यानंतर तात्काळ सर्वांची झोप उडाली. सगळे पटापट मुंबईहून आपापल्या मतदारसंघात गेले, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील शेतकरी सध्या गंभीर परिस्थितीत आहे. तुमचे राज्यपालांशी मतभेद सुरुच राहतील. यापूर्वी एकाच पक्षाचे सरकार असताना, त्याच पक्षाने राज्यपाल नियुक्त केलेले असतानादेखील राज्यपालांशी मतभेद झालेले आहेत. त्यामुळे आता तो विषय नाही. आता शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्त्वाचं आहे, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत मी बोलणार नाही. पण अशी सोयीची राजकीय भूमिका कोणीही घेऊ नका. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नकोय. तुम्ही काय करणार हे सांगा. पंचनाम्याची वाट न पाहता तात्काळ मदत करा. गुरांना चारा द्या, असं फडणवीस म्हणाले.
राज्यात अतिवृष्टी झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: मुख्यमंत्र्याना फोन करुन मदतीचं आश्वासन दिलं आहे. केंद्र सरकार नेहमीच मदत करतं. पण राज्याची पहिली जबाबदारी आहे. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं, असं फडणवीसांनी सांगितलं.
Read Also :
राज्य सरकार या प्रसंगी मदत करणार आहेच… अतिवृष्टीची पाहणी केल्यानंतर स्वतः शरद पवार यांनी सांगितली परिस्थितीhttps://t.co/z2IG7Tyek7#SharadPawar #NCP @PawarSpeaks @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020