नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. अनेक राज्यांमध्ये स्थिती गंभीर असून, परिस्थितीप्रमाणे त्या-त्या राज्यांमध्ये नवीन करोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली आहे. दुसरीकडे देशात करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्च पासून सुरु झाला असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेद्वारे लस टोचवून घेण्याचे आवाहन देशभरातील नेत्यांकडून केले जात आहे.
दरम्यान, देशात करोनाची अशी परिस्थिती असताना, उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी परत एक हास्यास्पद विधान केले आहे. सध्या त्यांच्या या विधानामुळे ते पुन्हा समाजमाध्यमांवर चर्चेत आले असून, यामुळे त्यांच्या जुन्या विधानाचीसुद्धा लोकांना परत आठवण झाली आहे.
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना तीरथ सिंग रावत यांनी, “महाकुंभ १२ वर्षातून एकदा येतो, दरवर्षी येत नाही. जत्रा दरवर्षी होतात आणि कुठेही होऊ शकतात. मात्र कुंभ हा हरिद्वारमध्येच होतो आणि १२ वर्षातून एकदाच होतो. त्यामुळेच महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं पाहिजे” असं मत रावत यांनी व्यक्त केलं आहे.
तसेच रावत यांनी यावेळी कुंभमेळा ‘उज्जैनमध्ये होतो, वाराणसीत देखील होतो’, असे म्हटल्याने आता परत ते चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी तीरथ सिंह रावत यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ते पूर्णपणे बरे झाले असून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत.
#WATCH | "(Mahakumbh) comes once in 12 years and is not held every year. 'Mele' take places at different places & can happen anywhere but Kumbh is held only in Haridwar in 12 years.. held in Banaras (Varanasi), held in Ujjain," said Uttarakhand CM Tirath Singh Rawat (06.04) pic.twitter.com/aExf23iYyv
— ANI (@ANI) April 7, 2021
रावत यांनी याआधी, “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत” असं म्हटलं होतं. यानंतर सर्वांनी यावरून निशाणा साधत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांनतर आपल्या विधानावर त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत, “आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही; पण तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध आहेच” असं म्हटलं होतं. यादरम्यान, ट्विटरवर #RippedJeans चा जोरदार ट्रेंड होताना पाहायला मिळाला.