सुशांतसिंह राजपूत न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बिहारी अधिकाऱ्यांवर शिवसेनेनंतर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शब्दांत तोफ डागली आहे. ‘नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परत आले, तर हे पोलीस महासंचालक नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील,” अशी टीका आव्हाड यांनी पांडे यांच्यावर केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला होता. मात्र यावेळी त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलाताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची तिची लायकी नाही असं म्हटलं होतं. त्यावरून पांडे यांच्यावर टीका होत असून, जितेंद्र आव्हाड यांनीही निशाणा साधला आहे.
दरम्यान सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासाला एका क्षणी मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असे वळण लागले होते. बिहारच्या पोलीस महासंचालकांनी या काळात अनेकदा वक्तव्ये केली होती. पाडे यांनी एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे मुंबई पोलिसांवर टीका केली होती. न्यायालयाच्या निकालानंतरही त्यांनी ‘न्याय की अन्याय पर जीत’ असं म्हटलं होतं. शिवाय, या प्रकरणातील एक संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याबद्दलही असभ्य भाषेत टीका केली होती. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून गुप्तेश्वर पांडे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. बिहारमधील गुन्ह्यांची उदाहरणे देऊन शिवसेनेनं काही प्रश्न उपस्थित केले होते.