मुंबई : अॅम्ब्युलन्सची अनुप्लब्धता, व्हेंटिलेटर-ऑक्सिजन खाटांच्या नियोजनातील ढिसाळपणा आणि मुर्दाड यंत्रणेचा फटका बसल्याने खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा ४२ व्या वर्षी हकनाक बळी गेला. रायकर यांच्या निधनानंतर राज्य सरकार आणि प्रशासकीय कारभाराचे धिंदवडे निघाले आहेत. त्यामुळे, याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे.
भाजपा नेते एकनाथ खडसे आणि अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका करत, शासनाच्या असुविधेचा हा बळी असल्याचं म्हटले आहे. तसेच, प्रशासन व्यवस्थेतील ज्यांनी हलर्गीजपणा केला, त्या हलगर्जीपणाचा हा बळी आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
राज्य सरकारने 3 जून रोजी कोरोना वॉरियर्स म्हणून पत्रकारांना 50 लाख रुपयांचा विमा सुरक्षा कवच देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही पत्रकारांसदर्भातील जीआर काढण्यात आला नाही. त्यामुळे, रायकर यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत करुन दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.