मुंबई – मुद्दा कुठलाही असो, शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत हे नेहमी भाजपाच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वावर टीका करतात. यावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊत यांना टोमणा मारला, आले अंगावर की ढकल भाजपावर, ही संजय राऊतांची भूमिका आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बहुतांश योजनांच्या विरोधात राऊत बोलतात. कोरोना काळात राज्यातील सर्व वर्गांतील नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली असताना राज्य मदत देण्यास असमर्थ असल्याचे सांगत त्यांनी अनेकदा केंद्राकडे बोट दाखवले. त्यांच्या या भूमिकेवर भाजपाने टीका केली.
“या सरकारला स्वतःचं कोणतंही धोरण नाही. कामे करण्याची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमधील तीनही पक्षांत समन्वय नाही. एक मंत्री एक भूमिका मांडतात. दुसरे वेगळेच काहीतरी सांगतात. ‘ना एकमत, ना धोरण’ असा हा प्रकार आहे. संजय राऊत यांचीही तीच भूमिका आहे. स्वतःच्या अपयशाचे किंवा स्वतःच्या मर्यादेचे खापर ते कायम कधी भाजपावर तर केंद्रावर फोडत असतात.” असे उपाध्ये म्हणाले.
संजय राऊत हे आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले असून ते लवकरात लवकर ठणठणीत बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो, अशा सदिच्छा केशव उपाध्ये यांनी व्यक्त केल्या. सरकारच्या वर्षपूर्तीबाबत बोलताना ते म्हणाले की, तीन पक्षांच्या सरकारसाठी जनता हा मुद्दाच नाही. त्यांच्यासमोर केवळ भाजपला रोखणे हाच अजेंडा आहे. त्यामुळे आम्हाला हे सरकार पाडण्यात अजिबात रस नाही. त्या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे.