मुंबई : अंधेरीत महाकाली लेणीजवळ 106 वर्षांपूर्वी रस्ता बनवण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील या रस्त्याच्या बदल्यात उद्योगपती विनोद गोयंका, शाहिद बलवा आणि अविनाश भोसले यांच्या कंपनीला 74 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
मागील काही दिवसांमध्ये किरीट सोमय्या यांनी सातत्याने मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. आता सोमय्या यांनी सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, अंधेरीतील महाकाली लेणी भाग पुरातत्व विभागाशी संबधित असल्याने हा भाग केंद्र सरकारच्या मालकीची आहे. 1914 साली याठिकाणी रस्ता बनवण्यात आला.
2014 साली या परिसरातील कमाल अमरोही स्टुडिओ हा महाल फीचर्स प्रायव्हेट लिमिटेडने विकत घेतला. या कंपनीने रस्त्याच्या बदल्यात टीडीआर मागितला होता. त्याला महानगरपालिकेने नकार दिला होता. आता सत्तांतर झाल्यावर पुन्हा त्या कंपनीने टीडीआर ऐवजी त्याचे 74 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी केली, असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
ज्याची मालकी केंद्र सरकारची आहे त्याचे पैसे या महाल फीचर्स कंपनीला देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. हा भ्रष्टाचार आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.