मुंबई : राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून १ मेपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच सोबत काही कडक निर्बंध देखील राज्यभरात लागू केले आहेत. तरीही राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, करोना साथीने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. तसेच यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड भार पडत असून, परिणामी रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसीवर आणि इतर औषधांसाठी वणवण फिरावे लागत आहे.
त्यामुळे राज्यात करोना साथीने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत असून, दुसरीकडे ऑक्सिजन अभावी देखील अनेक करोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. दुसरीकडे राज्यातल्या करोना परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
शनिवारी ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा जाब विचारण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि काही नेते, हे विलेपार्लेच्या बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते. यावरून सध्या राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे.
यावरून आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, राज्यातील परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. पण तसे दिसत नाही. विरोधक खूपच आक्रमक झालेले आहेत. योद्धा म्हणून काम करायला तयार नाहीत. परिस्थिती अधिकाधिक कशी बिकट होईल, यासाठी लक्ष दिले जात आहे, अशी बोचरी टीका भाजपवर केली आहे.
तसेच, एकीकडे खूपच कठीण परिस्थितीतून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता जात आहे. जबाबदारीने काम केल्यास यातून निश्चितच बाहेर पडू. रेमडीसिवीरचा साठा पकडल्यानंतर माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यात जातात. त्यांचा उद्देश काहीही असेल. परंतु, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागत आहे, हे किती मोठे दुर्दैव आहे. मुंबईत साठा पकडला गेला आहे. लोक वणवण भटकत आहे आणि हे काय चालले आहे, अशी टीका त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.