मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वांद्रे येथील कार्यालयावर महापालिकेने केलेली कारवाई चुकीची असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, ही कारवाई नियमानुसारच करण्यात आली. त्यामुळे आता या निर्णयचा परीणाम मुंबईतील अनाधिकृत बांधकामावर होऊ शकतो. अशी शक्यता व्यक्त करत याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महापालिका कायद्यानुसार अनधिकृत बांधकाम सुरु असताना 354 अ अंतर्गत नोटीस देऊन 24 तासाची मुदत दिली होती. त्यानंतरच कारवाई झाली. निकालावर कोणतेही भाष्य करणार नाही असे महापौरांनी सांगितले. न्यायालयच पालिका कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश वेळोवेळी देतं. मग, आता काय उणिवा राहील्या तपासू. ही पहिलीच नोटीस नव्हती. यापुर्वीही नोटीस दिली आहे. मग आताच काय झालं. न्यायालयाचा निकाल तपासून पाहू. येत्या 1 ते 2 दिवसात बैठक घेऊ, असेही महापौरांनी सांगितले.
ही कारवाई नियमानुसार झाली आहे. सुडापोटी कारवाई झाली असे कोणाचे म्हणणे असेल तर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिर सोबत करण्यात आली त्याची दाद कोणत्या न्यायालयात मागावी. महाराष्ट्रावर सुड उगवला जातोय असा हल्लाही त्यांनी कंगना रनौतवर चढवला.