मुंबई – हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली.
“राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आधीच्या काळात होते त्याच्यापेक्षा जास्त वकील दिले असल्याचं,” अजित पवार यांनी सांगितलं आहे. “आता जर कोणाला राजकारणच करायचं असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान याआधी विरोधकांकडून सभागृहाच्या पायऱ्यांवर मराठा आरक्षणाला गांभीर्याने न घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलं.
राज्य सरकार योग्य भूमिका मांडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “योग्य भूमिका वकील मांडणार. त्यांनी त्यांच्या काळात जेवढे वकील ठेवले होते ते तसेच ठेवले, शिवाय त्यात अजून काही दिले. जास्त चांगल्या पद्दतीने प्रकरण मांडता यावं यासाठीच हे केलं. आता जर कोणाला राजकारणच करायचं असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण आमची भूमिका स्पष्ट आहे. जसं आपल्या मुंबई हायकोर्टात ग्राह्य धरलं तसंच तिथं ते धरलं जावं म्हणून आम्ही मोठ्या खंडपीठाकडे गेलो”.
“प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना राज्य सरकारला कोणी प्रश्न विचारु शकतं का? आरक्षणाचा मुद्दा सोडून बाकीच्या प्रश्नांवर सरकार कधीही चर्चा करण्यास तयार आहे. मुख्यमंत्री, अशोक चव्हाण अशा काही मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वत: बाहेर येऊन चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं होतं,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.