मुंबई – मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला. या निर्णयानंतर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तसेच यावेळी नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
“सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालणारा हा निर्णय आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याला हे तीन पक्षांचे सरकार आणि मुख्यमंत्री कारणीभूत आहेत. राज्यात मराठा मुख्यमंत्री असता तर हा निर्णय अपेक्षित नसता, असे वक्तव्य करत मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी शिवसेनेची आधीपासून भूमिका आहे, मी शिवसेनेत अनेक वर्षे राहिलो. त्यामुळे मला हे माहीत आहे. उद्धव ठाकरे यांना आरक्षणाविषयी काहीच माहिती नाही.” असे नारायण राणे म्हणाले.
“आपल्यावर अन्याय झाल्याची मराठा समाजाची भावना आहे. हा निर्णय समाजाला प्रगतीपासून वंचित ठेवणारा आहे. इतर समाजाला आरक्षण मिळण्यात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. काहींना वाटत असेल मराठा समाज संपला, पण मराठा समाज अजून जिवंत आहे, आम्ही हा लढा सुरूच ठेवू. काही लोकांचे खायचे आणि दाखवण्याचे दात वेगळे, हे समाजाने लक्षात घ्यावे.” अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.