जळगाव – मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका मानला जात आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी देखील ठाकरे सरकारवर घणाघात टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्यानेच हे घडले आहे. सरकारमध्ये नियोजनाचा व समन्वयाचा अभाव होता, अशा शब्दांत आ. गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. गिरीश महाजन हे बुधवारी दुपारी जळगावात आलेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात असताना ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरआज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी सुरु झाली. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मराठा आरक्षण रद्द करण्याचा हा निर्णय राज्य सरकारसाठी खूप मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.