कोलकाता : गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नड्डांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात असतानाच ममता यांनी भाजपाच्या नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे काही काम नसल्याचा टोला लगावला आहे. “त्यांना दुसरी काही कामं नाहीयत. कधी इथे केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडे कोणी प्रेक्षक नसतात तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात,” असंही ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे.
नड्डा यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या आणि त्यामागे जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या गाड्यांबद्दलही ममता यांनी शंका उपस्थित केलीय. “तुमच्या नेत्यांचं इथे स्वागत आहे. मात्र आम्ही हिंसेला विरोध करतो,” असं ममता यांनी कोलकात्यामधील मायो रोड येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर दिलेल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. “तुमच्या ताफ्यामागे ५० गाड्या का होत्या? बाईक आणि प्रसारमाध्यमांचा गाड्या का होता? तिथे कोण उभं होतं? दगड कोणी फेकले? ते सर्व नियोजित होतं का? तुम्ही खूप हुशार आहात,” असं ममता यांनी भाजपावर टीका करताना म्हटलं आहे.
भाजपा केवळ नाटकं करत असल्याची टीका ममतांनी केली आहे. “मी दिल्लीला जाते तेव्हा काय होतं? मी दिल्लीत डेरेक (डेरेक ओ ब्रायन तृणमूलचे खासदार आहेत) यांच्या घरी राहते. दरवेळी मी तिथे गेल्यावर भाजपाचे कार्यकर्ते त्या घराला घेरतात,” असंही ममता यांनी म्हटलं आहे. “त्यांना दुसरी काही कामं नाहीयत. कधी इथे केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडे कोणी प्रेक्षक नसतात तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात,” असंही ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे.
सगळ्या केंद्रीय यंत्रणा हाताशी असून…
ममता यांनी सर्व केंद्रीय यंत्रणा हाताशी असताना भाजपाला स्वत:च्या पक्षाध्यक्षांचे संरक्षण करता येत नाही याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा नियोजित असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. “तिथे एक छोटा अपघात झाला होता. हा ताफा ज्या रस्त्यावर येत होता त्या रस्त्यावरील एका चहाच्या टपरीजवळ ताफ्यातील ५० गाड्यांपैकी एका गाडीने कोणाला तरी धडक दिली किंवा त्या गाडीच्या दिशेने काहीतरी फेकण्यात आलं किंवा हे नियोजित होतं. पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत. आम्ही तुमचे खोटे दावे सहन करणार नाही. आता हे अती होतं आहे,” अशा शब्दांमध्ये ममतांनी भाजपावर पलटवार केला.
“तुमच्याकडे सीआयएसएफ-बीएसएफचे एवढे कमांडो आहेत. तर त्यांनी तुमच्या गाडीला हात कसा लावला. तिथे तुमच्या सोबत असणाऱ्यांनी गोळीबार केला त्याचं काय?,” असे प्रश्न ममता यांनी उपस्थित केलं आहे. काल गोळी लागल्याने भाजपाच्या एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. या व्यक्तीला ज्या बंदुकीमधून गोळी लागली तशा बंदुकी पोलीस खात्याकडून वापरल्या जात नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
लोकांना भाजपा आवडत नसेल तर…
गुरुवारी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा ममता बॅनर्जींचे समर्थक आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. डायमंड हार्बरला जाताना नड्डा यांच्या गाडीवर हल्ला झाला. हल्ला झाला तो परिसर तृणमूलचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ आहे. “लोकांना भाजपा आवडत नाही तर मी काय करु शकतो?,” असा प्रश्न बॅनर्जी यांनी या हल्ल्यासंदर्भात बोलताना उपस्थित केलाय.
ही भाजपाची नाटकं…
“ते नवा हिंदू धर्म लागू करु पाहत आहेत. त्यांचा हिंदू धर्म आपला आमचा हिंदू धर्म नाही. ते जो धर्म लादू पाहत आहेत तो हिंदू धर्म नाही. त्याच्या या धर्माशी माझा तसेच तुमचाही काही संबंध नाही. अशाच पद्धतीने हिटलर मोठा झाला होता. चाउसेस्कू, मुसोलिनी सारखे हुकूमशाह मोठे झाले होते. आज नरेंद्र बाबू सरकार (हल्ल्याच्या) नाटकाचं नियोजन करते, नाटक करते आणि या नाटकाचे व्हिडीओ प्रसारमाध्यमांना पाठवते आणि विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांकडे त्यांना प्रश्न विचारण्याची ताकद नाहीय. प्रसारमाध्यमे त्यांनी पाठवलेल्या नाटकांमध्ये स्वत:च्या नाटकांचा समावेश करुन ती दाखवतात,” अशा शब्दांमध्ये ममता यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारला माहितीच दिली नव्हती…
“रोज भाजपच्या कार्यक्रमांमध्ये हत्यारं दिसतात. ते स्वत:चं एकमेकांना मारतात आणि तृणमूल काँग्रेसला दोष देतात. तुम्ही केवळ या परिस्थितीचा विचार करा. ते बीएसएफ, सीआरपीएफ, लष्कर, सीआयएसएफ घेऊन फिरत आहेत तर त्यांना कसली भीती आहे?,” असा प्रश्न ममतांनी उपस्थित केला आहे. नड्डा यांच्या ताफ्याला सुरक्षा पुरवण्यासंदर्भात आपल्याकडे कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती असं बंगाल सरकारने स्पष्ट केलं आहे. “तुम्ही राज्याला दौऱ्यासंदर्भात कळवत नाही. मात्र अडचण निर्माण झाल्यानंतर तुम्ही राज्याला दोष देता,” असा टोला यावरुन ममतांनी लगावला आहे.
चौकशीचे आदेश
या हल्ल्यानंतर भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी तृणमूलवर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. झे प्लस सुरक्षा असताना नक्की काय गोंधळ झाला याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आलेत.
Read Also :
यूपीएची ‘पॉवर’फूल खेळी… सोनिया गांधींच्या जागी शरद पवारांना मिळणार अध्यक्षपद?
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला, कारवर तुफान दगडफेक
‘मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?’, काँग्रेस नेत्याचं संतापजनक विधान
…तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास