मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांच्या गाडीच्या प्रकरणाचा तपास NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे, मात्र यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार का? अशी चर्चा आता होत आहे.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी मात्र ATS करणार आहे. या प्रकरणी एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हणलं आहे.
“मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीमध्ये ज्या जिलेटीन कांड्या सापडल्या. त्याचा तपास एटीएस करत होती. एटीएस चांगल्या पद्धतीने तपास करत होती. आज एकाएक परत केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे दिला. सात महिन्यापूर्वी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी महाराष्ट्र पोलीस चांगला तपास करत होते. पण, एकाएक सीबीआयने त्याचा तपास हाती घेतला,” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं.
दरम्यान, अंबानींच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरण याचा तपास NIA कडे द्यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण राज्य सरकारने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे NIA कडे ठाकरे सरकारला अशी काय अडचण आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
याआधी देखील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. सीबीआयचे अधिकारी चौकशीसाठी मुंबईत आल्यानंतर कार्यक्षेत्र, तपास अधिकार यावरून वाद झाले. या वादानंतर राज्यातल्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी CBI सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना दिलेली परवानगी राज्य सरकारने मागे घेतली. यापुढे CBI ला तपासासाठी महाराष्ट्रात येताना राज्य सरकारची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर आता मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयास्पद गाडीत आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास NIA कडे दिल्याने पुन्हा एका ठाकरे सरकारचे धाबे दणाणले आहेत. यामागचं कारणं महाराष्ट्र पोलीस दलाचे साहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे असावेत अशी श्यक्यता आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयास्पद गाडी मिळाल्यानंतर सर्वांत पहिले सचिन वाझे पोहोचल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मनसुख हिरेन प्रकरणी वाझे यांची भूमिका काय? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. आणि याच मुद्द्यावरून आज विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये विधानसभेत प्रचंड वाद झाले. दरम्यान, सचिन वाझे या प्रकारणांमागील मूळ आहे का? आणि असेल तर ठाकरे सरकार त्यांना वाचवण्याचा का प्रयत्न करत आहे? हे गूढ काही उलगडले जात नाहीये
सचिन वाझे आणि शिवसेना यांच्यातील नेमके संबंध काय?
सचिन वाझे हे महाराष्ट्र पोलीस दलात साहायक पोलीस निरीक्षक आहेत. ते मुंबई क्राइम ब्रांचच्या ‘क्राइम इंटेलिजन्स युनिट’ चे प्रमुख आहेत. ख्वाजा युनूस प्रकरणी मुंबई पोलिसांतल्या काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. सचिन वाझे हे त्यांच्यापैकीच एक होते. मे 2004 मध्ये त्यांना पोलीस दलातून निलंबिंत करण्यात आलं होतं. त्यानंतर वाझेंनी 2008मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
जून 2020मध्ये सचिन वाझेंचं निलंबन मागे घेण्यात आल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत सक्रीय झाले. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काही महिन्यांपूर्वी रायगड पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांकडून सचिन वाझे त्या टीमचं नेतृत्व करत होते.
वाझे हे एकेकाळी शिवसेनेत असल्या कारणाने ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे NIA ने वाझेंपासून चौकशीला सुरुवात केली तर शिवसेनेसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. अशी शक्यता आहे.