मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी या निर्णयावर भाष्य करताना महाविकास आघाडीवर निशाणा साधाला आहे.
सदाभाऊ खोत यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवमाणूस असा केलाय. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा सत्तेत यावं लागेल असंही खोत म्हणालेत.
“मराठा समाज हा खेड्यापाड्यात, रानावनात राहणार समाज आहे. शेतीमध्ये कष्ट करुन जगणारा समाज आहे. अनेक शेतमजूरही या समाजातील आहेत. या समाजाला राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागसवर्गीय आयोग स्थापन करुन मोठ्या कष्टानं आरक्षण मिळवून दिलं होतं. हे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये भक्कमपणे बाजू मांडल्यानं टिकून राहिलं होतं. मात्र आज राज्य सरकारनं ज्या पद्धतीने भक्कमपणे बाजू मांडायला पाहिजे होती तशी ती मांडली गेली नाही,” अशा शब्दांमध्ये खोत यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरआज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी सुरु झाली. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.