मराठा समन्वय समितीची पुण्यामध्ये आज बैठक पार पडली. मराठा समन्वय समितीच्या बैठकीनंतर विनायक मेटे यांनी सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विनायक मेटे चांगलेच आक्रमक झाले आहेत. विनायक मेटे यांच्या नेतृत्वात राज्यभरातल्या ९ मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती गठीत झाली आहे. या समितीने सरकारच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी केली आहे
‘सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरु असताना त्याकडे महाविकासआघाडी सरकार गांभीर्याने पाहत नाही. सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नाकर्तेपणा दिसून येत आहे, त्यामुळे मिळालेले आरक्षण जातंय की काय, अशी शंका आहे, तसंच समाजाचे प्रश्नही प्रलंबित आहेत, अशा परिस्थितीमध्ये अशोक चव्हाणांना हटवावे. एकनाथ शिंदे किंवा सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांकडून जबाबदारी काढून घ्यावी’, असं विनायक मेटे म्हणाले आहेत.
आमच्या मागण्यांसंदर्भात सरकारला निवेदन देऊ, तसंच सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करु. सरकार जोपर्यंत मराठा समाजाला विश्वासात घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. आम्ही कोणत्याही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा विनायक मेटेंनी दिला आहे.