मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पुढील रणनितीविषयी व कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांसह इतर नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी मराठी समाजाने संयम बाळगावा व समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न हाणून पाडावे असे आवाहन केले.
अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा समाजाने संयम बाळगावा. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतरिम आहे आणि त्यासंदर्भात राज्य सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार आहे. त्यामुळे कोणीही निराश होऊ नये. कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये.
काही मंडळींनी जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट केल्या जात आहेत. चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहे. मराठा समाजाने संतापून कायदा हातात घ्यावा आणि त्याचा राजकीय वापर करता यावा तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची चुकीची प्रतिमा निर्माण करता यावी, या हेतूने हे कारस्थान केले जाते आहे. समाजाने हे षडयंत्र ओळखण्याची आणि हाणून पाडण्याची गरज असल्याचे, अशोक चव्हाण म्हणाले.