मुंबई : काही दिवसांपुर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि ऑफिसवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यांचा मुलगा विहंगची देखील चौकशी करण्यात आली होती. यावर भाष्य करताना आता सरनाईक यांनी स्वतःला तानाजीची उपमा देत, हे कॉर्पोरेट वॉर असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झाला आहे. पण ते तानाजी मालुसरे 16व्या शतकातील होते. हा तानाजी 21व्या शतकातला आहे. ते तानाजी रयतेचे रक्षण करताना धारातीर्थी पडले होते. पण हा तानाजी समर्थपणे परिस्थितीला सामोरा जाईल, असे सरनाईक म्हणाले.
ईडी भारतातील मोठी संस्था आहे. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण त्यांनी बाहेर काढली आहेत. या संस्थेला तपासात आवश्यक ती सर्व मदत ही आपली भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सरनाईक यांना अनेकदा समन्स बजावून देखील ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले नाहीत. चौकशीला हजर न राहता 14 दिवस आठवड्यांची मुदत सरनाईकानी ईडीकडे मागितली होती. याविषयी बोलताना सरनाईक म्हणाले की, ईडी ज्यावेळेस चौकशीसाठी बोलवणार त्यावेळी मी चौकशीसाठी हजर होईन. मी त्यांना पत्र दिलं आहे. ईडीकडे मी जेव्हा मुदत मागितली तेव्हा त्यांनी मला मुदत दिली आहे.