महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे राज्य सरकारच्या कारभाराबाबत जनतेला काय वाटते यासाठी एका ऑनलाईन सर्वक्षणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये काही सरकार बाबतचे प्रश्न ऑनलाइन स्वरूपात विचारले जात आहेत. ज्याची लिंक देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आली आहे. १८ ऑगस्ट पर्यंत नागरिक यामध्ये आपले मत व्यक्त करू शकतात.
सरकारविषयी ‘या’ बाबतचे प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हवा की नको ?
आता या घडीला लॉकडाउन पूर्णपणे संपुष्टात आणायला हवा का ?
लॉकडाउनमुळे तुमच्या नोकरी धंद्यावर नकारात्मक परिणाम झाला का ?
लॉकडाउनमुळे बुडालेल्या तुमच्या नोकरी धंद्याबाबत सरकारने तुम्हाला योग्य मदत दिली आहे का ?
सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात घेतलेले निर्णय योग्य आहेत का ?
शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणाची अंमलबजावणी होत आहे का ?
उपनगरी लोकल व एसटी सेवा पूर्ववत सुरु व्हाव्यात का ?
लॉकडाउन काळात आलेल्या मोठ्या रकमेच्या वीजबिलांबाबत तुम्ही समाधानी आहात का ?
लॉकडाउन काळात वैद्यकीय मदत योग्य प्रकारे आणि वेळेत मिळाली आहे का ?
अशा प्रकारचे नऊ प्रश्न मनसेने आपल्या सर्वेक्षणात विचारले आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाउनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी बसून केलेल्या कामकाजाबाबत तुम्ही समाधानी आहात का ? असा देखील सवाल यामध्ये विचारण्यात आला आहे.
यामध्ये सहभागी नागरिकांना आपले नाव, संपर्क क्रमांक व राहण्याचे गाव एवढी माहिती द्यायची आहे. शालेय शिक्षणाचे शुल्क, नोकरी धंद्यासंदर्भातील सरकारी निर्णय, यासंदर्भात हे प्रश्न आहेत. या सर्वेक्षणाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.