मुंबई : मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार संभाजीराजे यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. आता सरकारच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचे संभाजीराजे यांनी स्वागत केले आहे.
मराठा समाजाच्या भावना समजून MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे सर्वप्रथम आभार!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 9, 2020
मराठा समाजाच्या भावना समजून MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे आभार, असे ट्विट संभाजीराजेंनी केले आहे.
राज्य सरकारने कुठल्याही दबावाखाली निर्णय घेतलेला नाही तर सर्व परिस्थितीचा विचार करून MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मुलांचा अभ्यासही झालेला नव्हता अशा सूचना आल्या होत्या त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितले.
दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्यासोबतच लवकरच परीक्षेची पुढची तारीख जाहीर करू, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.