मुंबई : ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. याचा रस्ते वाहतुकीसह आणि लोकल सेवेला फटका बसला. वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, असे आदेश कालच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, ऊर्जा सचिव असीम गुप्ता सहभागी होणार आहेत.
हा बिघाड अनपेक्षित होता की अपेक्षित होता किंवा यात काही गाफिलपणा झाला आहे का हे तपासण्याचे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी ज्या कारणांमुळे ही घटना घडली त्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यास सांगितले. येणाऱ्या चार दिवसात मुसळधार परतीच्या पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही वीजेच्या मागणीचा विचार करुन सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही, याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले.