नागपूर : हिवाळी अधिवेशन हे मागील अनेक वर्षात नागपुरात घेण्याची परंपरा पडली आहे. मात्र यंदा कोरोना व्हायरस महामारीमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत घेतले जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्येच घ्यावे, अशी मागणी केली आहे.
नागपूर करारानुसार दरवर्षी विधानमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत 55 पेक्षा अधिक अधिवेशने नागपूरात पार पडली आहेत. प्रामुख्याने वर्षाच्या अखेर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असते. मात्र इतर अधिवेशने देखील येथे झालेली आहे. हाच मुद्दा पुढे करत करत भाजप आमदारांनी हिवाळी अधिवेशन नागपुरमध्येच घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
2019 या वर्षात नागपुरात एकही अधिवेशन झालेले नाही. विदर्भातील जनतेचे असंख्य प्रश्न सरकारसमोर मांडायचे आहे. शिवाय नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन हा नागपूरचा हक्कच आहे. त्यामुळे कोरोना असला तरी खबरदारीच्या उपाययोजना करुन अधिवेशन नागपुरातच घेण्यात यावी, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी केली आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे, समीर मेघे, मोहन मते, प्रविण दटके यांनी याबाबतची मागणी केली आहे.
दरम्यान, याआधी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी कोरोनामुळे हे अधिवेशन नागपुरात घेऊ नये, असे म्हटले होते. त्यांच्या या मागणीला विरोध झाला होता.